मंदिर संस्कृती रक्षणासाठी मंदिर विश्वस्त आणि पुजारी यांचा समन्वय आणि संघटन आवश्यक ! – सुनील घनवट, राष्ट्रीय संघटक, मंदिर महासंघ
महाराष्ट्र मंदिर-न्यास अधिवेशनात सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड जिल्ह्यांतील २०० हून अधिक मंदिर विश्वस्तांचा सहभाग
सोलापूर – श्री तुळजाभवानी मंदिर विकास आराखडा आणि पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरातील संवर्धनाचे काम करतांना पुरातत्व विभागाने मंदिर, देवतांच्या मूर्ती, मंदिरांतील पुरातन परंपरा, तसेच मंदिराचे ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व यांची हेळसांड करू नये. असे झाल्यास मंदिर विश्वस्त, भक्त आणि हिंदू रस्त्यावर उतरून याचा विरोध केल्याशिवाय रहाणार नाही. मंदिर महासंघाचाही याला विरोध असेल. मंदिर संस्कृती रक्षणासाठी मंदिर विश्वस्त आणि पुजारी यांचा परस्पर समन्वय आणि संघटन आवश्यक आहे, असे मत मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी व्यक्त केले. ते दिनांक १० एप्रिल या दिवशी पद्मावती कन्व्हेन्शन हॉल, अक्कलकोट रोड, एमआयडीसी येथे आयोजित जिल्हास्तरीय महाराष्ट्र मंदिर-न्यास अधिवेशनात ते बोलत होते. या अधिवेशनात सोलापूर, बीड, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांतील मंदिर विश्वस्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सध्याच्या श्री तुळजाभवानी मंदिरातील पुजार्यांवर होत असलेल्या आरोपांविषयी श्री. घनवट म्हणाले की दोषींवर निश्चित कारवाई करावी; परंतु नॅरेटिव्ह (खोटी कथानके) करून पुजार्यांची बदनामी करणे थांबवावे.
मंदिरे, हिंदूंची आधारशीला बनण्यासाठी प्रयत्न करावे ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
पुरातन काळापासूनच मंदिरांनी सांस्कृतिक इतिहास जपण्याचे कार्य केले आहे. हिंदू समुदायाला एकत्रित आणण्याचे महान कार्य मंदिरांनी केलेले आहे. पूर्वी राजे महाराजे यांनी मंदिरांचे जतन आणि संवर्धन केले आहे; मात्र सध्या सरकारीकरण झालेल्या मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. त्यामुळे येणार्या काळात मंदिरे ही हिंदूंची आधारशीला बनण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत. प्रत्येक मंदिर हे हिंदूंना धर्मशिक्षण देणारे केंद्र बनायला हवे.
या वेळी तुळजापूर येथील अधिवक्ता श्री. शिरीष कुलकर्णी म्हणाले की , ‘श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील पुजारी हे अंमली पदार्थांच्या व्यापार प्रकरणात गुंतलेले आहेत’, अशा आरोपाखाली त्यांची अपकिर्ती केली जात आहे. दोषी कोण आहे हे न्यायालय ठरवेल आणि त्यांना योग्य ती शिक्षाही देईल. मात्र मंदिर समितीतील कोणत्याही शासकीय अधिकार्याने आरोप सिद्ध होण्यापूर्वी निरपराध पुजार्यांवर कारवाई करू नये, अन्यथा आम्ही कायदेशीररित्या त्या अधिकार्यांना धडा शिकवू, असे मी या मंदिर परिषदेत घोषित करतो.
श्री तुळजापूर देवस्थान घोटाळ्यात ८.५ कोटींचा अपहार समोर आणला ! – किशोर गंगणे, पुजारीमंडळ माजी अध्यक्ष, तुळजापूर
मंदिरे जोपासण्याचे काम भक्तांचे आहे, सरकारचे नाही. शासन अधिग्रहित श्री तुळजापूर देवस्थानातील सरकारी अधिकारी व ठेकेदारांनी केलेला ८.५ कोटी रुपयांचा घोटाळा आम्ही न्यायालयीन लढ्याच्या माध्यमातून समोर आणला; मात्र या प्रकरणातील आरोपींवर अद्याप कारवाई झालेली नाहीये.
अधिवेशनातील ठराव !
१. मंदिरांच्या भूमिंचे बेकायदेशीर हस्तांतरण रोखण्यासाठी Anti land grabbing act शासनाने तात्काळ लागू करावा.
२. मंदिरांमध्ये भक्तांनी श्रद्धेने अर्पण केलेला निधी हा सरकारला दिलेली देणगी किंवा कर नाही. त्यामुळे सरकारला मंदिरांतील पैसा विकासकामांसाठी वापरण्याचा कुठलाही अधिकार नाही. यासाठी महाराष्ट्र सरकारने मंदिरांची संपत्ती विकासकामांसाठी न वापरण्याची घोषणा करावी.
३. श्री तुळजाभवानी मंदिर आणि पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिर येथील मुख्य मंदिर आणि परिसर येथे विकासकामे करतांना मंदिर, देवतांच्या मूर्ती, मंदिरांतील पुरातन परंपरा, तसेच मंदिराचे ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व यांची हेळसांड करू नये. हेळसांड होतांना आढळल्यास मंदिर महासंघ याचा तीव्र विरोध करेल.
अधिवेशनाची सुरुवात सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये, श्री. सुनील घनवट, निवृत्त सहधर्मादाय आयुक्त श्री. दिलीप देशमुख, ‘प्रज्ञापूरी ज्ञानपीठा’चे पिठासन धर्माधिकारी श्री. प्रसाद पंडित, श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष श्री. किशोर गंगणे, पंचमुखी हनुमान मंदिराचे विश्वस्त आणि उद्योजक श्री. सत्यनारायण गुर्रम यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा संदेश पू. (कु.) दीपाली मतकर यांनी वाचला, तर अधिवेशनाचे सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे श्री. मिनेश पुजारे यांनी केले. या वेळी श्री. दीलीप देशमुख यांनी मंदिरांसंदर्भातील कायदेविषयक मार्गदर्शन केले.
आपला नम्र,
श्री. विनोद रसाळ , मंदिर महासंघ, सोलापूर
(संपर्क : 9975592892)
Leave a Reply